Wednesday, October 20, 2010

...........................तो !

...........................तो !


तो अशाच एका वाटेवरती चालत होता ,अंधारलेल्या !

सोसत होता त्रास किती ,

टोचणार्‍या काट्यांचा,बोचणार्‍या वार्‍यांचा,

खोचक शेर्‍यांचा,तीक्ष्ण टोमण्यांचा,न दिसणार्‍या खड्ड्यांचा,

कुठूनतरी झालेल्या दगडांच्या मार्‍याचा.

कितीदा तरी तो पडला , गुडघे फुटले,

टाचेवरच्या भेगा अधिक गडद झाल्या,रक्ताळल्या ,

तरीही तो न थांबता अखंड चालत होता !

क्वचीत कौतूकही वाट्याला आले,तो फुशारून गेला नाही

सहानूभूती व्यक्‍त करणारे भरपूर ,तो ती गोंजारत बसला नाही

त्याची नजर थेट समोर होती ,

प्रलोभनांकडे तर त्याने ढूंकूनही पाहीले नाही

त्याच्या अपेक्षा कधी जन्मल्याच नाही,

इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो धडपडत होता सतत !

चालतांना इतरांना सोबत घेण्याचा त्याने प्रयत्‍न करून पाहीला,

त्याला थोडं उशीरा लक्षात आलं,प्रत्येकाची वाट वेगळी आहे,

शक्य त्याला मदत करत चालत राहीला,तीव्र अंधारात

कारण ती वाट होती त्याच्या ध्येयाकडे जाणारी ,

त्याच्या आयुष्याला अर्थ देणारी !

एक दिवस तो त्या वाटेच्या टोकाला पोहोचला,

त्याच्या कष्टांचे सार्थक झाले, त्याचे ध्येय साध्य झाले

तो तिथेच थांबला पूर्ण विचार करून ,

जिथून त्याने प्रवास केला तिकडे तोंड करून

आणि ती अंधारी वाट अचानक उजळून गेली

कारण त्याच्या नंतर येणार्‍यांसाठी तो प्रकाश झाला होता !

                                                                   - समीर पु. नाईक

No comments:

Post a Comment